भारतीय सैन्य दलाने विश्वास सार्थ ठरवला : पवार   

मुंबई : आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणार्‍या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (शरदचंद्र पवार गट) यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,  या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणार्‍या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणार्‍या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन!

भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम : उद्धव

भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचे कुंकू पुसणार्‍या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला.  पाकिस्तानचे भारतातील स्लीपर्स सेल उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन  करणे गरजेचे आहे. 
 
भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी  सामना करण्यास सक्षम असल्याचे ’ऑपरेशन सिंदूर ’ ने दाखवून दिले आहे.भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
 

Related Articles